#coronolockdown:मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना घरी जाण्याची परवानगी द्या- आमदार भास्कर जाधव
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी न झाल्याने पुन्हा 19 दिवस लॉकडाऊन वाढण्यात आला आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आहे. कोकणातील अनेक चाकरमानी हे मुंबईत काम करतात. मात्र लॉकडाऊनमुळे ते त्या ठिकाणी अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना घरी जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.
देशातील महामार्गावरील जिल्हाअंतर्गत सीमाही बंद आहे. या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने वाहतुकीचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. मात्र माझ्या रोजीरोटीनिमित्त मुंबईत गेलेल्या कोकणातील चाकरमान्यांना कोकणात परतण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.
महाराष्ट्रासह इतर राज्यातून मुंबईत मोठ्या प्रमाणात लोक कामाच्या निमित्ताने येतात. मुंबई काम करणाऱ्यांमध्ये कोकणातील लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कोकणातील लोकांना कोकणात येऊ द्या, असे मी मुंबईत ही परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी सांगितले आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.
कोकणातील गावांमध्ये त्यांची घरे आहेत. त्यांना मोकळा श्वास घेता येईल. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. कोकणातील चाकरमान्यांना कोकणात परतण्यासाठी परवानगी द्या, अशी विनंती भास्कर जाधव यांनी केली आहे.