#CoronaVirus: “विदेशातून आलेल्या कुणाची कोरोना चाचणी राहिली असेल तर त्यांनी समोर यावं”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
करोनासंबंधीची विमानतळावर तपासणी सुरु झाली त्याआधी कुणी भारतात आलं असेल किंवा त्यांची करोना चाचणी झाली नसेल तर त्यांनी पुढे यावं. ज्या देशांची नावं त्यावेळी यादीत नव्हती त्या देशांमधून कुणी आलं असेल आणि त्यांना जर करोनाची लक्षणं जाणवत असतील तर त्यांनी समोर यावं. असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
” मला एक विनंती करायची आहे की जे पर्यटक किंवा प्रवासी मधल्या काळात विदेशातून आली आहेत विमानतळावर तपासणी सुरु होण्याआधी त्यांना जर अशी काही लक्षणं दिसत असतील तर त्यांनी समोर यावं. तसंच केंद्र सरकारने ज्या देशांची नावं त्यावेळी दिली होती त्या देशांशिवाय इतर देशांमधूनही कुणी आलं असेल तर त्यांनीही समोर यावं असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. ज्यांची तपासणी त्यावेळी झाली नसेल आणि आता त्या पर्यटकांना किंवा प्रवाशांना काही लक्षणं जाणवत असतील तर त्यांनी पुढे यावं. आपली माहिती लपवू नका. आपल्यापासून इतरांना धोका निर्माण करु नका. ही लक्षणं आढळली तर घाबरुन जाऊ नका समोर या” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.