#Coronavirus: गेल्या २४ तासांत ५ हजार ६०० रुग्णांची वाढ; १०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू
सध्या देशात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात नव्या ५ हजार ६११ रूग्णांची नोंद करण्यात आली. परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी दिली होती. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे देशात करोनामुळे होणारं मृत्यूचं प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत कमी आहे. तसंच करोनाग्रस्तांची संख्या १ लाखांच्या जवळ पोहोचण्यासही मोठा कालावधी लागल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकू संख्या आता ३ हजार ३०३ वर पोहोचली आहे. तर करोनाग्रस्तांची एकूण संख्या १ लाख ६ हजार ७५० वर गेली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये ५ हजार ६११ नवे रुग्ण आणि १४० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ३९ हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर ६१ हजार १४९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.