राज्यातील कोरोनास्थिती गंभीर; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
मुंबई – राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर बनली असून देशाच्या ६० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत. यामुळे केंद्र सरकारनेदेखील तातडीने कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकारी आणि काही मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,70,507 वर
राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. बुधवारी एका दिवसात कोरोनाचे २३ हजार १७९ रुग्ण सापडले होते. तर ८४ मृत्यू झाले होते. आजही यामध्ये तेवढीच वाढ होण्याची शक्यता आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २३ लाख ७० हजार ५०७ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ८० पर्यंत पोहोचला आहे. सध्या राज्यात एक लाख ५२ हजार ७६० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्य़ेला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यात 56 टक्के कोरोना लस शिल्लक असल्याचे सांगत लस का वापरली नाही, आताही गोंधळ सुरु आहे असा आरोप केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलताना राज्यात 10 दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा असल्याचे सांगितले. तसेच आणखी लस देण्याची मागणी केली. यावर लसीकरण वाढविण्याचा सल्ला मोदींनी दिला.