कोरोनाची दुसरी लाट : सवलतींचा गैरफायदा घेऊ नका – छगन भुजबळ
नाशिक – राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, रुग्णांची संख्येतही दिवसेंदिवस भर पडत आहे. राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये कोरोना संबंधीचे निर्बंध अधिक कडक केले असून, आता संपूर्ण महाराष्ट्रातच ३१ मार्चपर्यंतची नवी नियमावली जाहीर केली आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, “सरकारनं दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतला जात असेल, तर अशांवर कडक कारवाई केली गेली जाईल,” असा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांना दिला आहे.
वाचा :-राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करणार, गृहमंत्र्यांची घोषणा
“राज्यात कोरोनाची दुसली लाट आली आहे. नाशिकमध्ये कोरोनाचे १० हजार ८०० कोरोना रुग्ण आहेत. कोविड यंत्रणा सक्षमपणे कार्यरत असून १५ मार्च रोजी पॉझिटिव्हिटीचा दर हा ४१% होता, तो आता ३२% झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात रोज २० हजार तपासण्या होत आहेत. पण, या दुसऱ्या लाटेच्या वेळी बाधित झालेले लोक तिथपर्यंत गेले नाही, तर उपयोग होणार नाही”, असं भुजबळ म्हणाले.
“नागरिक जबाबदारीनं वागले नाहीत, तर पुन्हा पूर्ण लॉकडाऊन करायचा निर्णय लांब नाही. अर्थचक्र थांबवायचं नसेल तर बंधनं पाळा, अशी विनंती भुजबळ यांनी नाशिककरांना केली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी नाशिक मध्ये 17 मार्चपासून विवाह सोहळ्यांवर पूर्णत: बंदी घालण्यात आली असून, पुढील आदेश येईपर्यंत विवाह सोहळ्यांवर पूर्णत: बंदी असेल. असा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.