कोरोनाचा उद्रेक! देशात 24 तासांत तब्बल 53,476 नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थिती चिंताजनक होत असतानाच आता देशभरातही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. देशात मागील 24 तासांत 53,476 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 251 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,17,87,534 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 1,60,692 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 26,490 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,12,31,650 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 3,95,192 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,64,881 वर
दरम्यान, भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉक काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच परदेशात आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.