उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? घटनातज्ञ उल्लास बापट याचं मोठं विधान
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उद्या येणार असल्याचं सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावरून ज्येष्ठ घटनातज्ञ उल्लास बापट यांनी सर्वेच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मोठं विधान केलं आहे.
उल्लास बापट म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या निलंबनाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला तर कायदा स्वच्छ आहे आणि त्यानुसार तो निर्णय घ्यायचा अधिकार आत्ताच्या अध्यक्षांना असेल. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्यापालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी जे सत्र बोलावलं ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार बोलावलं नव्हतं म्हटलं आणि तो आदेशच चुकीचा ठरवला तर त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. कारण उद्धव ठाकरेंनी राज्यापालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सत्र बोलावल्यावर राजीनामा दिला होता.
हेही वाचा – शिंदेंच टेन्शन वाढणार! १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय नरहरी झिरवळच घेणार?
या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय ते सत्र बोलावण्याआधीच जी स्थिती होती ती पूर्ववत करू शकतं. असा स्थितीत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि नरहरी झिरवळ हेच हंगामी विधानसभा अध्यक्ष होतील. असं एकदा झालेलं आहे. एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती राजवट रद्द ठरवली आणि आधीच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा बसवलं. हा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे, असं उल्हास बापट म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना उल्हास बापट म्हणाले की, मुख्यमंत्री केव्हाही राजीनामा देऊ शकतात. त्याला कोणतंही बंधन नाही. हा बुद्दीबळाचा डाव सुरू आहे. आमदार अपात्र ठरले तर सरकारच पडतं. त्यामुळे तात्पुरता कुणी दुसरा नेमला तर सरकार पडणार नाही आणि त्यांच्यामागे बहुमतही राहण्याची शक्यता आहे. कारण गुळाला जसे मुंगळे लागतात, तसे सत्तेकडे सर्व लोक ओढले जातात.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपा-शिवसेनेच्याच हातात सत्ता राहिली, तर दुसरा मुख्यमंत्री होईल, असा डावपेच असू शकतो, असंही उल्हास बापट म्हणाले.