महाविद्यालयांकडून शूल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना तगादा – सुनिल गव्हाणे
- राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली तक्रार
पिंपरी / महाईन्यूज
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशात राज्यातील महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना शूल्क जमा करण्यासाठी तगादा लावला जात आहे. अन्यथा विद्यापीठ किंवा एमएसबीटीईचा परीक्षा फॉर्म भरू देणार नाही. त्यासाठी पात्र ठरवणार नाही, अशा प्रकारची धमकी विद्यार्थ्यांना दिली जात आहेत. कोरोनाकाळाचा विचार करता महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शूल्क भरण्यास वेळ द्यावा. विद्यार्थ्यांना कसलाही त्रास होऊ नये, यासाठी महाविद्यालयांना तशा सूचना द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात गव्हाणे यांनी राज्यमंत्री तनपुरे यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या राज्यात कोविड 19 विषाणु संक्रमणाचा धोका आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन आहोरात्र सक्रिय आहे. अशातच राज्यातील महाविद्यालयांकडून शूल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना तगादा लावला जात आहे. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झालेला आहे. काहींची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. काहींच्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती निघून गेल्यामुळे त्यांच्यावर वाईट परिस्थिती ओढवली आहे. अशात विद्यार्थ्यांवर शूल्क भरण्यासाठी दबाव वाढवणे योग्य नाही, असे गव्हाणे यांनी म्हटले आहे.
चालू वर्षाचे शूल्क भरले नाहीत, तर विद्यापीठ किंवा एमएसबीटीईचा परीक्षा फॉर्म भरू देणार नाही. याशिवाय परीक्षा देण्यासाठी पात्र ठरवणार नाही. अशा धमक्या विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे महाविद्यालयातील शिक्षक आणि इतर कर्मचा-यांच्या वेतनाचा आर्थिक भार सोसणे संस्थांना कठीण झाल्याची कल्पना आहे. परंतु, विद्यार्थी शूल्क बुडवणार नाहीत, त्यांना शूल्क भरण्यासाठी थोडासा वेळ द्यावा. यात आपण लक्ष घालून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याबाबत आपण महाविद्यालयांना सूचना द्याव्यात, अशी मागणी गव्हाणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
त्यावर तातडीने राज्याचे तंत्र शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र रा. चितलांगे यांनी राज्यातील महाविद्यालयांना परिपत्रक काढून यासंबंधीत सूचना दिल्या. उन्हाळी परीक्षा 2021 करीता विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेताना त्यांच्याकडून शूल्क भरण्यासाठी तगादा लावून त्यांच्यापुढे अडचण निर्माण करू नये. अर्ज विहित कालावधीत न भरल्यास विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान सहन केले जाणार नाही. विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्यास, त्यांच्या होणा-या शैक्षणिक नुकसानास संस्था प्रमुख म्हणून आपण जबाबदार रहाल, अशी तंबी राज्यातील महाविद्यालयांच्या प्रचार्यांना देण्यात आली आहे.