राज्यात पुढील निवडणुकीत काँग्रेस असेल सर्वात मोठा – प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे भाकित
पुणे |महाईन्यूज|
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असेल’ असं राजकीय भाकित पटोले यांनी केलं आहे. तसंच काँग्रेस हा सत्तेतला प्रमुख पक्ष राहील, असंही पटोले यांनी दावा केल्यामुळे महाविकास आघाडीबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी भाजपच्या विरोधात एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता स्थापन केली. पण भविष्यातील निवडणुकांत महाविकास आघाडीचं काय होणार असा सवाल समोर येत आहे. त्यात नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे. पटोले यांनी भाजपवर टीका करतानाच ‘काँग्रेसची शक्ती कशी वाढली हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्याचबरोबर आमच्याकडे पक्षाला मानणाऱ्या लोकांसाठी जागा आहे, संधीसाधूंसाठी नाही. आमची दारं सगळ्यांसाठी उघडी आहेत, असंही ते म्हणाले.
पटोले यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. ‘भाजपचं सरकार सत्तेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये लोकांनीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला. खोटी आश्वासन देणं आणि लोकांची दिशाभूल करणे एवढाच फडणवीस यांचा धंदा आहे, असं पटोले म्हणाले. ‘भाजप नेते सत्ताजीवी आहेत. ते सत्तेशिवाय राहू शकत नाही. तर नरेंद्र मोदी प्रचारजीवी पंतप्रधान आहेत, नागरिकांच्या जीवाची काळजी करण्याऐवजी ते प्रचार करत आहेत. देशानं पहिल्यांदाच असे प्रचारजीवी पंतप्रधान पाहिले, अशी टीका पटोलेंनी केली.
देशाला विकण्याशिवाय भाजप दुसरं काही करू शकत नाही. त्यामुळं पंढरपूरमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला पाहिजे, असं म्हणत पाटोलेंनी भाजपवर निशाणा साधला. एकूणच नाना पटोलेंनी भाजपवर टीका करतानाच राज्यात त्यांच्याबरोबर सत्तेत असलेल्या सहकारी पक्षांनाही अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत. काँग्रेसवर सध्या राज्यातील आणि सत्तेतील सर्वात कमकुवत पक्ष असल्याचा आरोप वारंवार होतो. मात्र पटोलेंनी केलेल्या वक्तव्यानं भविष्यातील राजकारणाचे संकेत दिले आहेत.