Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमुंबई

काँग्रेसने आमदारांसाठी काढले फर्मान; महाविकास आघाडी सरकार संकटात

मुंबईः राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अनेक खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी काँग्रेसच्या सर्व आमदारांची चाचपणी केल्यानंतर बुधवारी सकाळी सर्व आमदारांची हजेरी पक्षश्रेष्ठींनी घेतली. तसेच पुढील काही दिवस सर्व आमदारांना मुंबईत राहण्याचे आदेश देण्यात आले असून, कुणीही मुंबई सोडून जाऊ नये, असे फर्मान काँग्रेसने आमदारांसाठी काढले आहेत. काँग्रेसचे सर्व आमदार हे पक्षासोबतच असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कमलनाथ यांनी घेतलेल्या बैठकीस काँग्रेसचे सर्व ४४ आमदार उपस्थित होते.

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. काँग्रेसनेही या सर्व परिस्थितीवर निरीक्षणासाठी ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची नियुक्ती केली असून, त्यांनी बुधवारी सकाळीच मुंबई गाठली. त्यानंतर त्यांनी तातडीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निवासस्थान गाठले. याठिकाणी त्यांनी काँग्रेस नेते मंडळी, मंत्री आणि आमदारांशी संवाद साधला.

या बैठकीत काँग्रेसचे सर्व ४४ आमदार उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत काँग्रेसने सर्व आमदारांना मुंबईतच राहण्याची सूचना केल्याची माहिती एका आमदाराने ‘मटा’शी बोलताना दिली. काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनीही या बैठकीस हजेरी लावल्याने काँग्रेसने सुटकेचा निश्वास सोडला. मंगळवारी पार पडलेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत धोटे यांनी हजेरी लावली नव्हती. त्यामुळे दिवसभरात अनेक उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. अखेर धोटे यांच्या उपस्थितीनंतर या चर्चेला पूर्णविराम लावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button