छगन भुजबळ यांचं मनोज जरांगे पाटलांना थेट आव्हान; म्हणाले…
मुंबई | मनोज जरांगे पाटील यांनी थेट मंडल आयोगालाच आव्हान दिले होते. यावर टीका करताना छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना इशारा दिला. मनोज जरांगे पाटील यांच्यात हिमंत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवावे, असे विधान छगन भुजबळ यांनी केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, झुंडशाहीसमोर नमते घेऊन मागच्या दाराने लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. सगेसोयरे वैगरे मागण्यामुळे भटके-विमुक्त, वंचित ओबीसींच्या आरक्षणावर घाला घातला जात आहे. अशा परिस्थितीत आमच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे आमदार-खासदारांसमोर आमची कैफियत मांडणे, न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे, लोकांमध्ये जनजागृती करणे, आक्रोश व्यक्त करणे, असे मार्ग आमच्यासमोर उरले आहेत.
जरांगे पाटील यांच्याएवढा ज्ञानी देशात दुसरा नाही. ते तीन कोटी मराठा बांधव मुंबईत आणणार होते. पण नवी मुंबईत सर्वांनीच पाहिले किती लोक होते ते. मंडल आयोगाला त्यांना विरोध करायचा असेल तर त्यांनी जरूर करावा आणि मंडल आयोगाला संपविण्याचे काम करून दाखवावे, असं छगन भुजबळ म्हणाले.
हेही वाचा – ‘देवेंद्र फडणवीस उच्चभ्रू आणि ब्राह्मण जातीच्या बाबांवर कारवाई करत नाही’; श्याम मानव यांचा गंभीर आरोप
मी एका जातीसाठी नाही तर ओबीसी प्रवर्गासाठी लढत आहे. या प्रवर्गात साडे चारशे जाती आहेत. जरांगे पाटील केवळ एका जातीसाठी लढत आहेत. मराठा समाजाला मागच्या दाराने आरक्षण प्रवेश दिला जात असल्याबाबत छगन भुजबळ यांनी आक्षेप व्यक्त केला. मंत्रिमंडळ बैठकीत मी याबद्दल आक्षेप घेतला, पण मंत्रिमंडळाची बैठक अजेंड्यावर चालत असते. त्या अजेंड्यावर हा विषय नव्हता, असंही छगन भुजबळ म्हणाले.
गावागावत सध्या उन्मादाचे वातवरण दिसत आहे. रात्रीच्या तीन-तीन वाजेपर्यंत डीजेचा दणदणाट सुरू आहे. जिथे ओबीसी वस्ती आहे, तिथे अधिक उन्माद करण्यात येत आहे. आम्ही मुंबईवरून आरक्षण घेऊन आलो आहोत, हा विजयी उन्माद साजरा केला जात आहे. डीजेवर मला शिवीगाळ करणारी गाणी वाजवली जात आहेत, अशी माहिती माझ्यापर्यंत आली आहे. राज्यात दुर्दैवाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी खंतही छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.