मनोज जरांगेंना पुन्हा उपोषण करण्याची गरज काय? छगन भुजबळांचा सवाल
मुंबई | मराठा आरक्षणाच्या आध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत आक्रमक मुद्दे मांडले आहेत. कुणबी नावाने मागच्या दाराने मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवण्याच्या प्रयत्नाचा आक्रमकपणे विरोध करणारच, अशी ठाम भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ही लोकांच्या घरासमोर रात्री ३-३ वाजेपर्यंत वेडंवाकडं बोलून त्रास दिला गेला. हे झाल्यानंतर पुन्हा उपोषण करण्याचं कारण काय? मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मागच्या दाराने त्यांना कुणबी म्हणून घुसवू नका. सगेसोयरेच्या नावाखाली त्याची नको ती व्याप्ती वाढवू नका.
जरांगेंना वाटलं असेल की १५ तारखेला येणारच आहे, मराठा आरक्षण मिळणारच आहे. मग आपण १० तारखेलाच उपोषणाला बसावं.जेणेकरून त्याचं श्रेयही मिळवता येईल. त्यांची धारणा चुकीची नाही. पण त्यांचं काम पूर्ण झालं नाही. ते आणखी ५-६ दिवस पुढे गेलंय. आता ते शिव्याच द्यायला लागले आहेत. तेही आईवरून शिव्या देत आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले.
हेही वाचा – आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवड मधील खेळाडूंची दमदार कामगिरी
गल्लीवरचे लोक शिव्या देतात तशा शिव्या देत आहेत. तिथे असणाऱ्या एसपी, जिल्हाधिकाऱ्यांना ते तुम्ही सगळे भा*** आहात असं म्हटल्याचं चॅनल्सवर दिसलं. त्यांनी असा त्रागा न करता शांत बसावं. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा आम्ही पारित करतो आहोत. शिव्या देऊन किंवा आणखी भानगडी करून काय फायदा आहे? सगेसोयरेच्या माध्यमातून जे तुम्ही कुणबी म्हणत घुसवले आहेत, त्याविरोधात आमचा लढा चालूच असणार आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय की मराठा समाज मागास नाही. त्यामुळे त्यांना हवं तसं आरक्षण मिळणं शक्यच नाही. ते कुणबी प्रमाणपत्राच्या मदतीनं ओबीसींमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. ३७४ जातींमध्ये ७ कोटी लोक आहेत. या मंडळींमध्ये त्यांनी बसू नये. त्यांनी त्यांचं वेगळं आरक्षण घ्यावं, असंही छगन भुजबळ म्हणाले.