मनसेसोबत युती करण्यावरुन चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान…
मुंबई |
परप्रांतीयाबाबतच्या राज ठाकरेंच्या भाषणाची क्लिप मला मिळाली आहे. ते भाषण मी ऐकले असून त्याबद्दल माझ्या मनात काही शंका आहेत. त्यावर येत्या दोन दिवसांत राज ठाकरे यांची भेट घेऊन मी चर्चा करणार आहे. पण आमच्यात युतीबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नाही असं भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. युतीबाबत केंद्रातील आणि इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडली. माझी आणि राज ठाकरेंची परप्रांतियांबाबतच्या भूमिकेवर चर्चा सुरू असून मुझे तो आमसे मतलब है, चर्चेतून प्रश्न सुटतात असं सूचक विधानदेखील त्यांनी केलं. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची नाशिकमध्ये भेट झाली होती. यानंतर त्यांच्या युतीची चर्चा झाल्याचं बोललं जात होतं. तसंच राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांना आपल्या परप्रांतीयांच्या भूमिकेसंबंधी गैरसमज दूर व्हावेत यासाठी ऑडिओ क्लिप पाठवल्याचं वृत्त होतं. राज ठाकरेंनी हे वृत्त फेटाळलं होतं.
प्रसाद लाड यांच्या विधानाबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, “प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली असून आता तो विषय संपला आहेठ”. महाराष्ट्रची ही संस्कृती नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्यावर ते म्हणाले की,”काहीही बोलाल का? ते मानसिक संतुलन बिघडले असे म्हणतात. काही सूचना केल्या तरी ते बोलतात. आदित्य ठाकरे बोलत नव्हते ते आता बोलायला लागले”. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालाची खुर्ची सोडून बोलावे अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. त्यावर ते म्हणाले की, “राज्यपाल यांच्यावर काहीही बोलायची परंपरा सुरू झाली आहे. त्यावर आम्ही काहीही बोलणार नाही. ते पद मोठे असून नाना पटोले आणि राज्यपाल यांनी काय बोलावे हे मी सांगू शकत नाही”.