CAA देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी – मोदी
नवी दिल्ली | आज देशात नागरिकत्व कायद्याविरोधात (Citizenship Amendment Act) आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, हे चुकीचे आहे. गरिबांच्या झोपड्या पेटवू नका. मोदीचा पुतळा जाळायचा असेल तर जरुर जाळा. पण गरिबांना त्रास देऊ नका, त्यांच्या रिक्षा जाळू नका, असे आवाहन करताना CAA हा कायदा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लागू करण्यात आला आहे. हा कायदा मुस्लिम विरोधी नाही. काही राजकीय पक्ष मुस्लिमांमध्ये त्याबाबत भ्रम निर्माण करत आहेत, असा जोरदार हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला आहे.
दिल्लीत रामलीला मैदानावर भाजपकडून ‘धन्यवाद’ रॅली आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मोदींनी काँग्रेसवर चौफेर टीका केली. नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. माझा पुतळा जाळा पण संपत्तीचं नुकसान नको. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समस्या रखडत ठेवणे आमच्या संस्कारात नाही. अर्बन नक्षली लोक याचा अपप्रचार करत आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी हे नक्की काय आहे, हे जनतेने समजून घ्यावे. युवकांनी याबाबत वाचन करावे. विरोधी प्रचाराला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन मोदी यांनी केले.