‘एल्गार’ प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा!
पुणे | महाईन्यूज
भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर एल्गार परिषदेतील लोकांवर राष्ट्रद्रोहाचे चुकीचे गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास काढून घ्यावा आणि त्यांचे निलंबन करून निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमून चौकशी करावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारकडून शनिवारी व्यक्त केली आहे. अजित पवार यांना विदर्भातील सिंचन घोटाळ्यात निदरेषत्व मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर असे आरोप प्रचंड होतात, पण सिद्ध काहीच होत नाही, अशी प्रतिक्रियाही शरद पवार यांनी व्यक्त केलेली आहे.
एल्गार परिषदेच्या संयोजकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्य़ांसंदर्भात पवार यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडलेली आहे. पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह असून मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणून तुरुंगात डांबणे हा सत्तेचा गैरवापर आहे व याबाबत बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांचे निलंबन करून राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीशांची समिती नियुक्त करून चौकशी करावी, अशीही सूचना शरद पवार यांनी केली आहे.