मतदारांना मोठा दिलासा…! मतदान ओळखपत्र आता फक्त १५ दिवसांत; आयोगाचा वेगवान उपक्रम

Voter ID card : देशभरातील मतदारांना देण्यात येणाऱ्या निवडणूक ओळखपत्रांसाठी महिनाभर कराव्या लागणाऱ्या प्रतीक्षेचा कालावधी कमी करण्याचे प्रयत्न केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात येत आहे. प्रक्रियेत सुधारणा करताना ओळखपत्र १५ दिवसांत उपलब्ध करुन देण्याचा संकल्प आयोगाने निश्चित केला असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने शिफारस केलेल्या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया राबवली जात आहे. मतदारांसाठी सुलभ व जलद सेवा देणे, हा आयोगाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी आयोगाने म्हटले आहे. या नव्या प्रणालीत, मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) ओळखपत्र तयार करताच त्याची ट्रॅकिंग प्रक्रिया सुरू होईल आणि भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून कार्ड वितरित होईपर्यंत ती चालू राहील.
हेही वाचा – “…म्हणून मी ट्रम्प यांचं अमेरिका भेटीच निमंत्रण नाकारलं”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं कारण
मतदारांना त्यांच्या कार्डच्या स्थितीबाबत प्रत्येक टप्प्यावर एसएमएसद्वारे माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमासाठी निवडणूक आयोगाने नुकतेच सुरू केलेल्या ईसीआयनेट या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक विशेष आयटी प्रणाली विकसित केली आहे. तर, टपाल विभागाच्या एपीआय प्रणालीची ईसीआयनेट सोबत संलग्नता केली जाणार असून, या माध्यमातून निवडणूक ओळखपत्र वितरण अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.
दरम्यान, गेल्या चार महिन्यांत आयोगाने मतदारांच्या हितासाठी विविध सुधारणा केल्या असून, ही ओळखपत्रासाठीची वितरणाची नवीन प्रणाली ही त्या श्रेणीतील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.





