बिमस्टेक देश स्थापणार तज्ज्ञांचे गट

- हवामान बदलावर करणार उपाययोजना
काठमांडू – जागतिक हवमान बदलामुळे पर्यावरणावर भीषण परिणाम होत असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पॅरीस कराराच्या अंमलबजावणीत भरीव योगदान देण्याचा निर्धार बिमस्टेक संघटनेतील भारतासह सहा देशांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी आंतर सरकार पातळीवर तज्ज्ञांचे गट स्थापन करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला.
बिमस्टेकच्या चौथ्या अधिवेशनाच्या अखेरीला जो जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे त्यात ही
घोषणा करण्यात आली आहे. या परिषदेला भारताच्यावतीने पंतपधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. पर्यावरण रक्षणासाठी सदस्य देशांनी एकमेकांच्या सहकार्याने उपाययोजना करण्याचाही निर्धार व्यक्त केला आहे. जागतिक तापमान बदलामुळे पर्यावरणाला गंभीर धोका पोहचत आहे. याचाच दुष्परिणाम हिमालयातील पर्यावरणावरही होत असून त्यातून बंगालच्या उपसागर आणि भारतीय समुद्राला हानी पोहचत असल्याचेही या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
या साऱ्याचा एकत्रित दुष्परिणाम लोकसमुहांवरही होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी व्यापक उपाययोजना करण्यासही या देशांनी कटिबद्धता व्यक्त केली आहे. त्यानुसार प्रत्येक सदस्य देशांनी आपआपल्या गरजा आणि क्षमतेनुसार जबाबदारी वाटून घेण्याचे ठरवले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळातही या सदस्य देशांनी एकमेकांना सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.





