निवडणूक आयोगाच्या कारभारात भाजपचा हस्तक्षेप
नवी दिल्ली |
निवडणूक आयोगाच्या (ईसी) कारभारामध्ये भाजप हस्तेक्षप करीत असल्याचा आरोप गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयोगाने सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, तरीही आमचा विजय कोणीही रोखू शकणार नाही, कारण जनता आमच्यासोबत आहे, असे त्या म्हणाल्या.निवडणूक आयोगाने गेल्या काही दिवसांत सरकारमधील अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या त्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. ज्या पद्धतीने भाजप आयोगाच्या कारभारात हस्तक्षेप करीत आहे त्यावरून हा भाजप आयोग असल्याचे वाटते, असे ममता यांनी दांतन येथील एका जाहीर सभेत सांगितले.
निवडणूक आयोगाबद्दल आपल्याला आदर आहे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी पोलीस केंद्राच्या नियंत्रणाखाली का असतात, निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली का नाहीत, असा सवाल ममता यांनी केला. निवडणूक आयोग आपल्या सरकारला सापत्नभावाची वागणूक देत असल्याचेही त्या म्हणाल्या.निवडणूक आयोगाने हिंमत असल्यास आपल्यावर कारणे-दाखवा नोटीस बजावावी, निवडणूक आयोगाने १० पत्रे पाठविली तरी आपण त्याला घाबरत नाही, असेही ममतांनी स्पष्ट केले. भाजपने एखाद्या अधिकाऱ्याची बदली करण्याची इच्छा व्यक्त केली ती त्वरित का पूर्ण केली जाते, असा सवालही त्यांनी केला.
- ५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे ‘ईसी’कडून आदेश
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (ईसी) पश्चिम बंगालमधील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांना निवडणूकविषयक काम देण्यात येऊ नये, असे आयोगाने म्हटले आहे. पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संयज सिंह, पोलीस उपायुक्त (दक्षिण कोलकाता) सुधीर नीळकंठ, कूचबिहारचे पोलीस अधीक्षक के. कन्नन, डायमंड हार्बरचे पोलीस अधीक्षक अविजित बॅनर्जी आणि झारग्रामचे जिल्हा निवडणूक अधिकारी आयेशा राणी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, असे गुरुवारी अधिकृत सूत्रांनी सांगितले.