पोलीस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय करणार नाही- अजित पवार
मुंबई – पोलीस दलाच्या कामकाजाला गालबोट लावण्याचं काम कुणी करत असेल, जनतेच्या मनातून पोलीस दलाला उतरवण्याचं काम कुणी करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
जी वस्तुस्थिती आहे, जे खरं सत्य आहे ते महाराष्ट्रातील जनतेसमोर 100 टक्के येईल. काळजी करण्याचं कारण नाही. गेले काही दिवस राज्यात जे काही वातावरण तयार करण्यात आले. त्यामध्ये कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. चौकशा सुरू आहेत, असं अजित पवारांनी म्हटलंय.
रश्मी शुक्लांचे पत्र काय आहे? सुबोध जैस्वाल यांचे पत्र काय आहे? यादी दिलीय त्याबाबत बोलण्यात आले आहे. मी आज प्रशासनात काम करत नाही. गेली 30 वर्षे प्रशासन सांभाळत आहे. असे सांगतानाच ज्यांच्याकडे कुठलंही महत्त्वाचं पद नाही अशा पध्दतीने कुणाबद्दलही येत आहे. त्यांचीही चौकशी करु, असं अजित पवारांनी सांगितलं.
दरम्यान, विरोधक सातत्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहे. पण मला त्यांना सांगायचंय की महाविकास आघाडी कडे पूर्ण बहुमत आहे. आमच्या मित्रपक्षाचे आमदार आमच्यासोबत आहे. साहजिकच महाविकास आघाडी पूर्णबहुमताने सत्तेत आहे, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना फटकारलं आहे.