ओबीसी आरक्षण रद्द होण्यास भाजप सरकार जबाबदार – नाना पटोले
जळगाव – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं ग्रामीण अधिवेशन फैजपूर येथे झालं. धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांचे दहन करून नाना पटोले यांनी उत्तर महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली आहे. त्यावेळी विविध विषयावरून नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
ओबीसी आरक्षण रद्द होण्यास भाजप सरकार जबाबदार आहे. 2017 मध्ये हा विषय आल्यावर हेच राज्यातील ओरडणारे विरोधी पक्षातील लोक सत्तेत होते, त्यावेळी त्यांनी लक्ष दिले नाही. केंद्र सरकार ओबीसीची आकडेवारी देत नाही. त्यामुळे न्यायालयाने राज्यातील राजकीय आरक्षण रद्द केले आहे. मात्र आता हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा प्रश्न आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही लवकरच चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
केंद्रातील अत्याचारी मोदी सरकारला शेतकऱ्यांसाठी वेळ देता येत नाही. तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सात महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनात 400 शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी या शेतकऱ्यांची साधी भेटही घेतली नाही. शेतकरी थंडी, पाऊस, उन्हात आंदोलन करत असताना पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाऊन प्रचारात व्यस्त होते, असं म्हणत नाना पटोेले यांनी मोदींवर टीका केली आहे.
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकार हे इंग्रज राजवटीपेक्षा जुलमी आणि अत्याचारी आहे. सरकार शेतकरी, कष्टकरी विरोधी असून शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवून देशोधडीला लावण्याचं काम करत आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.