‘मला भाजपाचा खूप त्रास आहे’; बच्चू कडूंचा भाजपावर गंभीर आरोप
मुंबई : प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाकडून मला त्रास होतोय, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. तसेच आपल्याबरोबर असलेल्या लोकांसाठी फिल्डिंग लावण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत असंही बच्चू कडू म्हणाले. ते अकोला येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले, मला भाजपाचा खूप त्रास आहे. आम्हाला काँग्रेसचा आणि इतर पक्षांचा जितका त्रास होत नाही तितका त्रास भाजपाचा आहे. माझ्या मतदारसंघात भाजपाचा सगळ्यात जास्त त्रास होतोय. परंतु, आम्ही त्यांना जुमानत नाही. दोन खासदार, तीन आमदार आणि अजून ताकद लावा. परंतु, माझं म्हणणं आहे की मैत्री करताना, मित्रत्व निभावताना सगळ्याच अनुषंगाने निभावलं पाहिजे.
हेही वाचा – पुणे विद्रुपीकरण केल्याने पुनीत बालन यांना सव्वा तीन कोटींचा दंड
मैत्री न निभावता फक्त कामापुरतं वापरायचं आणि नंतर दुर्लक्ष करायचं. हे चुकीचं आहे आणि भाजपाकडून असं होऊ नये. भाजपावाल्यांनी वरून खालपर्यंत व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. परंतु, मला वाटतं त्यांनी केवळ सत्तेपुरता विचार न करता, सत्तेपलिकडे काही गोष्टी असतात, त्या स्वीकारल्या पाहिजेत. तसेच आपल्याबरोबर असलेल्या लोकांसाठीच फिल्डिंग लावायची हे उद्योग बंद केले पाहिजेत, असं बच्चू कडू म्हणाले.