‘..तर आम्ही २१ लाख देऊ’; बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना अंनिसचं खुलं आव्हान
पुणे : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा पुण्यात नुकताच सत्संग आणि दिव्य दरबार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला लाखो पुणेकरांनी हजेरी लावली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावरून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धीरेंद्र शास्त्रींना खुलं आव्हान दिलं आहे.
धीरेंद्र शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन अंनिसच्या आव्हानाला चॅलेंज करत, अंनिसने दरबारात येऊन दूध का? दूध आणि पाणी का? पाणी करावं, असं म्हटलं होतं. यावरून अंनिसचे सदस्य मिलिंद देशमुख म्हणाले, धिरेंद्र शास्त्री यांनीच समोर यावं. आम्ही दरबारात येणार नाहीत. सर्वांसमोर सोक्षमोक्ष लागेल. आम्ही त्यांची एक परीक्षा घेऊ त्यात ते पास होतील की नाही बघुयात.
हेही वाचा – सुषमा अंधारेंनी मनोज जरांगे-पाटलांना चांगलच सुनावलं; म्हणाल्या..
बंद पाकिटातील आम्ही सांगितलेल्या नोटांचा नंबर ओळखल्यास आम्ही त्यांना २१ लाख रोख बक्षीस म्हणून देऊ आणि अंधश्रद्धा निर्मूलन संस्था कायमची बंद करू, असे आम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असे खुले चॅलेंज धीरेंद्र शास्त्री महाराज यांना दिले आहे. पण, हे आव्हान धीरेंद्र शास्त्री महाराज स्वीकारतील असे वाटत नाहीत. कारण ते केवळ दरबारात असे बोलू शकतात, असे त्यांनी म्हटलं आहे. अंनिसचं हे खुलं आव्हान धिरेंद्र शास्त्री महाराज स्वीकारणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.