सुषमा अंधारेंनी मनोज जरांगे-पाटलांना चांगलच सुनावलं; म्हणाल्या..
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जरांगे पाटलांना चांगलच सुनावलं आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, जरांगे पाटील हे सुरूवातीला आरक्षणासाठी लढत असल्याचं निश्चित वाटत होतं. पण, अलीकडे त्यांची भूमिका पाहून आरक्षणावरील लक्ष्य विचलित झाल्याचं वाटत आहे. त्यांनी व्यक्तिगत टीका-टीप्पणी करणं शोभत नाही.
एकीकडे मागास सांगायचं आणि जरांगे आडनावाबरोबर पाटील लावायचं. आर्थिक मागास असल्याचं बोलायचं आणि दुसरीकडे १०० जेसीबीने फुलांची उधळण करायची. आमच्याकडे काहीच नाही बोलायचं आणि सभेसाठी १५० एकर मोसंबीची बाग तोडायची, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
हेही वाचा – ऑस्ट्रेलियाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ सज्ज; स्टेडियमचा पिच रिपोर्ट काय?
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. यातून केंद्र सरकारच मार्ग काढू शकते. विधिमंडळाने एक ठराव पास करून केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
केंद्र आणि राज्यातील भाजपा भांडण लावण्याचं काम करत आहे. कारण, महिला सुरक्षा, आरोग्यव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, कंत्राटी भर्ती, बेरोजगारी, दुष्काळी परिस्थितीबाबत भाजपा अपयशी ठरली आहे. भाजपाने सगळे मुद्दे विचलित करून फक्त आरक्षणाच्या मुद्दा चर्चेत आणला आहे. भाजपाला आरक्षण द्यायचं नाही. फक्त जाती-जातींमध्ये भांडण लावायचं आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.