स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ; देशात महाराष्ट्र, तर राज्यात पुणे अव्वल
पुणे | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत आयोजित उपक्रमांची संख्या आणि त्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर राज्यात पुणे जिल्ह्याने अग्रस्थान मिळविले आहे. देशात झालेल्या उपक्रमांपैकी तब्बल ७५ टक्के उपक्रम केवळ महाराष्ट्रात राबवण्यात आले आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १२ मार्च ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. या आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती खास अमृतमहोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर भरणे अपेक्षित होते. त्यामध्ये संपूर्ण भारतातून ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा व राज्य या चारही स्तरावर सर्वांत जास्त चार लाख चार हजार २८२ इतक्या उपक्रमांचे आयोजन आणि संकेतस्थळावर माहिती भरून महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्या खालोखाल झारखंड ४८ हजार ७०४ आणि गुजरात ४२ हजार ३९६ उपक्रम अंमलबजावणीसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवांतर्गत संकेतस्थळावर एक लाख एक हजार ९३५ उपक्रमांची माहिती भरत पुणे जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. त्या खालोखाल नगर जिल्ह्याने दुसरा, तर गडचिरोली जिल्ह्याने तिसरा क्रमांक मिळवला. ग्रामपंचायत स्तरावर राज्यात सर्वाधिक एक लाख एक हजार २९२ उपक्रमांची माहिती पुणे जिल्ह्याने भरली आहे. जिल्ह्यातील १३८५ ग्रामपंचायतींमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानांतर्गत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा परिषदेने सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात यासाठी स्वतंत्रपणे निधीची तरतूद केली होती, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.