खासदार अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला; नरेंद्र मोदींचाही उल्लेख!
पुणे : अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे पाहायला मिळत आहेत. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानावर खोचक शब्दांत टीका केली आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी इतक्या घाईनं शिवसंकल्प अभियानाची सुरूवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणं हेच शेतकरी आक्रोश मोर्चा जिथे पोहोचायचा तिथे पोहोचलाय याचं घोतक आहे. मुख्यमंत्री इथे येत आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवड केली यासाठी मी मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांचं शिरूर लोकसभा मतदारसंघात नक्कीच स्वागत आहे. पण तुम्ही येताना कांद्यावरची निर्यातबंदी उठली आहे, बिबटप्रवण क्षेत्रात थ्री फेज लाईट दिली आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रूपये अनुदान आहे असे निर्णय घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघात या. आपलं स्वागत आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.
हेही वाचा – लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदे गटातील नेत्याचं विधान
देशात भाजपा सक्षम असून दुसऱ्या आघाडीची देशाला गरज नाही, असं मोदींनी म्हटल्याचं माध्यमांनी विचारलं. यावर अमोल कोल्हे म्हणाले, असं पंतप्रधान म्हणत असतील तर महायुतीचं नेमकं काय होणार? महायुतीतल्या घटकपक्षांसाठी पंतप्रधानांचं विधान चिंता करायला लावणारं आहे.
प्रत्येकाचा राजकीय पक्ष आहे. ते वेगवेगळे दौरे करत आहेत. पण महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी केलेले दौरे राजकीय आहेत की खरंच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत हा प्रश्न जनतेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही जर हे दौरे केले तर ती भूमिका जास्त महत्त्वाची ठरेल, असंही अमोल कोल्हे म्हणाले.