राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनचे पाऊल
– राबवली ही मोहिम
पुणे | प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्त घरीदारी, वाहनांसाठी घेतले जाणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्ततः पडून त्याचा अवमान होऊ नये म्हणून ‘भारत फ्लॅग फाऊंडेशन’ने पुढाकार घेतला आहे. नागरिक आणि संस्थांनी इतस्ततः पडलेले ध्वज आढळल्यास ते भारत फ्लॅग फाऊंडेशन, मुरुडकर झेंडेवाले, पासोडया मारूती मंदिरासमोर बुधवार पेठ येथे जमा करावेत, असे आवाहन फाऊंडेशनचे संस्थापक गिरिश मुरुडकर, कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे की, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात; मात्र हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचऱ्यात किंवा गटारात पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते, तसेच ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाबाह्य ठरते.
तरी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमाचे हे २० वे वर्ष आहे. जमा साहित्याची शास्त्रशुद्ध, सन्मानपूर्वक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.या मोहिमेत सामिल होण्यासाठी महितीपत्रक व बॉक्सेस हे फाउंडेशन तर्फे विनामूल्य पुरवले जातील . गिरीश मुरूडकर -9822013292,राहुल भालेराव -9822596011 यांच्याशी संपर्क साधता येईल. ज्या तिरंग्यासाठी हजारोनी बलिदान केले, तो तिरंगा पायदळी जाऊ नये,याची काळजी घ्यावी, ध्वजविषयक आदर्श आचारसंहितेचे पालन करावे,असे आवाहनही फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे .