ऑल द बेस्ट! आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा
मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मार्च-एप्रिल 2022 दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची ऑफलाईन परीक्षा होत असून यंदा 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. आज पहिला पेपर प्रथम भाषेचा असणार आहे. दरम्यान, यंदा दहावीच्या परीक्षार्थिंना वेळ वाढवून देण्यात आला आहे. दहावीच्या लेखी परीक्षेत 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे आणि 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.
दहावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण 22 हजार 911 शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून राज्यातील 21 हजार 284 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. सकाळच्या सत्राचा पेपर १०.३० वाजता आणि दुपारच्या सत्राचा पेपर ३ वाजता सुरू होईल. पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाईल. मग दहा मिनिटे आधी त्यांना प्रश्नपत्रिका मिळतील. दहावीच्या परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ पर्यायी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असणार आहे. कोरोनाची पार्श्वभूमी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण लक्षात घेऊन प्रश्नांची काठीण्य पातळी सामान्य असेल, असेही राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.