‘ठाकरे सरकार पडताना महायुतीत जाण्याचं काहींनी पत्र दिलं’; अजित पवारांचं मोठं विधान
मुंबई : अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर राष्ट्रवादीत दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे सरकार पडताना महायुतीत जाण्याचं काहींनी पत्र दिलं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
अजित पवार म्हणाले, बरेच जण आमची बदनामी करतात. आम्ही महायुतीत सामील झालो म्हणून टीका टिप्पणी करतात. आमच्यावर दबाव होता म्हणून आम्ही सत्तेत सामील झालो अशी टीका करतात. परंतु, आमच्यावर लोकांची कामं करण्याचा दबाव होता म्हणून आम्ही सत्तेत सामील झालो आहोत. संधी मिळाल्यावर लोकांची कामं केली पाहिजेत. लोककल्याणकारी योजना शेवटच्या माणसापर्यंत आपण राबवल्या पाहिजेत. लोकहिताला प्राधान्य देणं हाच आमचा मार्ग. त्यासाठी आम्ही महायुतीत सामील झालो आहोत. परंतु, काहीजण आमची बदनामी करत असतात.
हेही वाचा – ‘पुणे, चंद्रपुरात निवडणूक घ्यायची हिंमत नाही’; सामनातून केंद्र सरकारवर हल्लाबोल
मित्रांनो, मी आज महाराष्ट्राला एक गोष्ट सांगतो. खरंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार ज्या दिवशी पडत होतं, त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व आमदारांनी, एखाद दुसरा आमदार राहिला असेल, परंतु सर्वच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी एक पत्र तयार केलं आणि ते पत्र नेत्यांना दिलं. या पत्रात म्हटलं होतं की महायुतीत सामील व्हा. हे खोटं असेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन. कुणाची तयारी आहे का? आणि हे खरं असलं तर मग जे लोक खोटं बोलतात त्यांनी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे. आहे का त्यांची तयारी? असा सवाल अजित पवार यांनी विरोधकांना केला.
कोल्हापुरात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. अशा शहरात कोणी जातीय, धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सरकारमध्ये असतानाही तो हाणून पाडू हे वचन मी या जाहीर सभेतून कोल्हापूरकरांना देतोय. कोल्हापूरकरांचा विचारांचा वारसा, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पुढे नेऊ, असं अजित पवार म्हणाले.