देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले..
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना सरकारमधील समावेशाला विरोध दर्शवला आहे. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहीत याबाबतची नाराजी व्यक्त केली आणि हे पत्र त्यांनी ट्विटरवरही पोस्ट केलं. त्यामुळे दोन सत्ताधाऱ्यांमध्ये विसंवाद निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलं. यावरून, अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, नवाब मलिक कालच सभागृहात आले होते. ते कुठे बसले हे टीव्हीवाल्यांनीच दाखवलं आहे. यात स्वत: नवाब मलिकांची भूमिका अद्याप आलेली नाही. आम्ही महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदाच ते सभागृहात आले. त्यांची भूमिका काय आहे हे पाहावं लागेल. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यांची भूमिका ऐकल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचं पत्र मला मिळालं. मी ते वाचलं आहे.
हेही वाचा – केंद्र सरकार आता स्वस्तात गव्हाचे पीठ विकणार? एक किलोसाठी एवढा दर
सत्ता येते आणि जाते.
पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा… pic.twitter.com/WDzm3Pjo3f— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2023
कुणी कुठे बसावं हे ठरवण्याचा अधिकार माझा नाही, तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. इतर कोण काय म्हणालं हे मला माहिती नाही. नवाब मलिकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी माझी भूमिका मांडणार. त्या पत्राचं काय करायचं ते माझं मी बघेन. त्याबद्दल मीडियाला काही सांगण्याचं कारण नाही, असंही अजित पवार म्हणाले.