भाजप सरकारमधील मंत्र्याचा भीषण शाप !
बलिया – उत्तरप्रदेशातील भाजप सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी आपल्याच समर्थकांना जबरी इशारा देताना त्यांना एक भीषण शाप दिला आहे. आपले जे समर्थक आपल्या विरोधकांच्या सभांना उपस्थित राहतील त्यांना काविळ होईल असा शाप त्यांनी दिला आहे. त्यांच्या या अजब वक्तव्याने खळबळ माजली आहे.
ओमप्रकाश राजभर हे सुहेलदेव भारत समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि हा पक्ष भाजपच्या उत्तरप्रदेशातील सरकारचा घटक पक्ष आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की ज्यांना अशा पद्धतीने काविळ होईल त्यांना मी औषध रूपी आशिर्वाद दिले तरच ते यातून बरे होतील अन्यथा त्यांची या काविळीतून कधीच सुटका होणार नाही. आपल्याच पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या एका मेळाव्यात बोलताना त्यांनी काल ही अजब वाणी केली.
राज्यात त्वरीत दारूबंदी करावी या मागणीसाठी त्यांनी हा मेळावा आयोजित केला होता. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील निवडणूक प्रचारात दारूबंदीचे आश्वासन दिले होते त्याची आठवण आपण त्यांना करून दिली असून त्यांनी त्वरेने उत्तर प्रदेशात दारूबंदी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.