‘पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण राजगड करा’; अजित पवारांची मागणी
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत केली मागणी
पुणे : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण राजगड करावे अशी मागणी, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहीत ही मागणी केली आहे.
अजित पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण राजगड तालुका करण्याबाबत लोकभावना तीव्र आहेत. याबाबत पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव करून वेल्हे तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी ५८ ग्रामपंचायतींना वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे करणेबाबत सकारात्मक ठराव दिले आहे.
वेल्हे तालुक्यामध्ये स्थित असलेल्या राजगड या किल्ल्याशी तालुक्यामधील तमाम नागरिकांचे जिव्हाळ्याचे संबंध असून सदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम राजधानी असलेने सदर ठिकाणावरून छत्रपती शिवाजी महाराज यांनी २७ वर्षे शासन चालवले असल्याने वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड असे करण्यात यावे अशी वेल्हे तालुक्यातील नागरिकांची तीव्र इच्छा आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.