पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? अजित पवार म्हणाले,..
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा २०१४ आणि २०१९ मध्ये सर्वदूर पोहोचली. नरेंद्र मोदींचा करिश्मा देशात चालला. त्यांनी देशात तसा विश्वास संपादन करत किंवा आपल्या भाषणातून जनतेला आपलंसं करण्याचं काम मोदींनी केलं आहे, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी म्हटलं आहे. ते एका माध्यमसमूहाने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, भाजपाकडे अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखं नेतृत्व होतं. तरीही त्यांना जे जमलं नाही, ते पंतप्रधान मोदींनी करून दाखवलं. भाजपाला पूर्ण बहुमत कधीच मिळालं नव्हतं. ते बहुमत मिळवून देण्यातं काम नरेंद्र मोदींनी केलं.
१९८४ नंतर पहिल्यांदा देशात २०१४ साली बहुमत असलेलं सरकार अस्तित्वात आलं. काँग्रेसच्या सरकारमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागली. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आपला करिश्मा निर्माण केला, हे नाकारता येणार नाही. मात्र, आज नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? असा प्रश्न विचारला, तर कोणतंही नाव समोर येत नाही, असं अजित पवार म्हणाले.