‘अजित पवारांनी त्यावेळी शपतच घ्यायला नको होती’; नाना पटोले
अजित पवारांकडे १४५ आमदार असतील तर त्यांनी मुख्यमंत्री व्हावं
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आम्ही नाईलाजाने काम केलं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले म्हणाले की, अजित पवारांकडे १४५ आमदार असतील तर त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. सारखं मी मुख्यमंत्री बनतो, असं म्हणायची काही गरज नाही. खरं तर आज राज्यात अनेक प्रश्न आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. खारघरमध्ये श्रीसेवकांचा मृत्यू झाला. महागाईमुळे जनता परेशान आहे. बेरोजगार वाढत आहे, त्यामुळे अशा राजकीय विषयांकडे लक्ष देण्यापेक्षा या मुद्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
अजित पवारांनी त्यावेळी शपतच घ्यायला नको होती. उपमुख्यमंत्री पदावर बसून खदखद निर्माण करण्यापेक्षा बाहेर राहून खदखद व्यक्त करायला हवी होती. मुळात त्यांनी अशा प्रकारचं विधान करावं हे अपेक्षित नाही. त्यांनी केलेलं विधान चुकीचं आहे, असं नाना पटोले म्हणाले.
गौतम अदाणी आणि शरद पवार यांच्या भेटीवरही भाष्य केलं आहे. कोण कोणाला भेटतं हा ज्याचा-त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र आम्ही सर्व घडामोडींकडे लक्ष ठेऊन आहोत, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली.