अजित पवारांनी स्पष्ट केली सचिन वाझे प्रकरणातील सरकारची भूमिका
मुंबई – सचिन वाझे प्रकरणामुळं राज्यातलं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजपनं या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरलं आहे, तर महाविकास आघाडीतही मॅरेथॉन बैठका घेण्यात येत आहेत. आजही वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्र्यांसोबत बैठक झाली. ज्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाशी संबंधित, राज्याची भूमिका स्पष्ट केली.
“या प्रकरणात सरकार कोणताही हस्तक्षेप करणार नाही, कुणाला करूनही देणार नाही, हीच सरकार म्हणून आमची भूमिका आहे. महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचेल, अशी कोणतीही कृती सरकारकडून कधीही केली जाणार नाही.”असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.
“मी राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने सांगतोय, की कोण कुठल्या पक्षात होतं-नव्हतं, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. एनआयए एनआयएचं काम करत आहे व महाराष्ट्र एटीस त्याचं. त्यामुळे या पप्रकरणाचे धागेदोरे ज्यांच्यापर्यंत जातात, त्यांना शोधून नक्कीच काढलं जाईल. एनआयए व महाराष्ट्र एटीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, जे कोणी या प्रकरणात दोषी आढळेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अमुक एका पक्षाचा म्हणून कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही.” असंही ते यावेळी म्हणाले.
सचिन वाझे प्रकरणामुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. सरकारमध्येही मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर, “महाविकास आघाडीमध्ये असलेल्या कोणत्याही पक्षात मतभेद नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीला महाविकास आघाडी सरकार मधल्या सर्व पक्षातल्या नेत्यांची उपस्थिती होती. त्यामुळे विनाकारण समाजमाध्यमांनीही गैरसमज करून घेऊ नये व तो पसरवू नये. हे सरकार जनतेसाठी सत्तेवर आलेलं आहे. ते जनतेच्या हिताचेच कायम निर्णय घेईल.”असं अजित पवार सांगितलं.