विधान भवनात आंदोलन करणाऱ्या रोहित पवारांना अजित दादांनी फटकारलं; म्हणाले..
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज सकाळी विधानसभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलनाला बसले होते. पाटेगाव-खंडाळा-कर्जत-अहमदनगर प्रस्तावित एमआयडीसी लवकरात लवकर मंजूर व्हावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. या मुद्द्यावरून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
अजित पवार म्हणाले की, अनिल देशमुखांनी विधिमंडळ सदस्यांबाबत एक मुद्दा उपस्थित केला. त्यासंदर्भातल्या एका पत्राची कॉपी माझ्याकडे आहे. उदय सामंत यांनी १ जुलै २०२३ ला रोहित पवारांना पत्र दिलं आहे. या पावसाळी अधिवेशनात संबंधितांसमवेत बैठकीचं आयोजन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा असं पत्र उदय सामंतांनी दिलं. मंत्रीमहोदय पत्र देतात, अजून अधिवेशन संपलेलं नाही. एकच आठवडा झालेला आहे. आत्ताच दुसरा आटवडा सुरू झालाय. लोकप्रतिनिधींनी उद्योगमंत्र्यांनी दिलेल्या पत्राची दखल घेतली पाहिजे. अशा पद्धतीने आंदोलनाला बसणं उचित नाही.
हेही वाचा – निधीवाटपावरून अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, ५० कोटी..
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, उद्योग विभागामार्फत कर्जतमध्ये एमआयडीसी होण्याबाबत बैठकीचं आयोजन करण्याचं आश्वासन मी दिलं आहे. या संदर्भातल्या अधिसूचनेसाठी उद्योग विभाग सकारात्मक आहे. त्यासाठी तातडीने पावलं उचलली जातील, असं आश्वासन रोहित पवार यांना दिलं त्यानंतर त्यांनी आदोलन मागे घेतलं.
मा. @AjitPawarSpeaks दादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. #MIDC चा विषय हा आजचा नाही तर केवळ अधिसूचना काढून पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी वारंवार मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटून विनंती केली, निवेदनं दिली, विधानसभेतही आवाज उठवला.… pic.twitter.com/4u1quC8BGT
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 24, 2023
रोहित पवार म्हणाले की, अजित दादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. एमआयडीसीचा विषय हा आजचा नाही. तर केवळ अधिसूचना काढून पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी वारंवार मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटून विनंती केली, निवेदनं दिली, विधानसभेतही आवाज उठवला. परंतु राजकीय दबावाला बळी पडत सरकारने प्रत्येक वेळी माझी आश्वासनावर बोळवण केली. त्यामुळे नाईलजाने उपोषणाला बसण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझी आपणास विनंती आहे की, उपमुख्यमंत्री म्हणून आपणच याकामी लक्ष घालू हा प्रश्न मार्गी लावला तर माझा संपूर्ण मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील!, असं रोहित पवार यांनी ट्वीट केलं आहे.