हज हाऊसच्या इमारतीमध्ये पूर्ण क्षमेतेने विद्यार्थ्यांना प्रवेश द्या
– राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार डॉ. फौजिया खान यांची मागणी
– केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना पत्र
दिल्ली / प्रतिनिधी
मुंबई येथील हज हाऊसच्या इमारतीमध्ये 200 विद्यार्थ्यांना यूपीएससीचे प्रशिक्षण देण्यासाठी सोय करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नसून त्यांच्या जेवण आणि राहण्याच्या शुल्कात कपात करण्यात आली आहे. याकडे राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार डॉ. फौजिया खान यांनी लक्ष वेधले असून याबाबत त्यांनी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना पत्र दिले आहे.
खासदार डॉ. फौजिया खान यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हज हाऊस मुंबईची इमारत ही फक्त एक महिना हज यात्रेकरूंसाठी उपयोगी पडते. त्यानंतर 11 महिने ती इमारत रिकामी असते. या इमारतीतच 200 विद्यार्थ्यांना यूपीएससीचे प्रशिक्षण देण्यासाठी सर्वोच्च दर्जाच्या भौतिक सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
पत्रात पुढे म्हटले आहे, मात्र, सध्या या इमारतीमध्ये केवळ 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. जे विद्यार्थी यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आणि पूर्वीच्या बॅचचे आहेत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तसेच जेवण आणि राहण्याच्या व्यवस्थेवरील शुल्कात मिळणारे अनुदान रद्द केले आहे.
या सर्व गोष्टींचा परिणाम हा अल्पसंख्याक सामाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना बाधा आणणारा आहे. सर्व प्रकरणाची तात्काळ दखल घेउन केंद्रीय पातळीवरून योग्य ते निर्देश द्यावेत. जेणेकरून अल्पसंख्याक समाजातील होतकरू आणि हुशार तरुणांना न्याय मिळेल. तसेच प्रधानमंत्री 15 कलमी अल्पसंख्याक कार्यक्रमाचे उद्दिष्टे देखील पूर्ण होईल, असेही पत्रात म्हटले आहे.
हज हाऊस मुंबई ची इमारत ही फक्त एक महिना हज यात्रेकरूंसाठी उपयोगी पडते आणि 11 महिने ती रिकामी असते. या इमारतीतच 200 विद्यार्थ्यांना UPSC चे प्रशिक्षण देण्यासाठी सर्वोच्च दर्जाच्या भौतिक सोयी सुविधा निर्माण केले आहेत..1/n pic.twitter.com/CkM7KeJfZP
— Fauzia Khan (@DrFauziaKhanNCP) January 20, 2022