मोबाईल चोरल्याच्या संशयावरून एकाचा खून
पिंपरी : ही घटना बुधवारी (दि. २०) सायंकाळी चिखली येथे घडली.मोबाईल फोन चोरी केल्याच्या संशयावरून वाद घालत एका व्यक्तीला लाकडाने बेदम मारहाण करत ठार मारण्यात आले.
महादेव विठ्ठल शिंदे (वय ४५, रा. मोरे पाटील चाळ, चिखली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राजू अनिल गांगुली (वय २८), विनोद शांताराम पवार (वय २२, दोघे रा. कुदळवाडी, चिखली) यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय पंचमुख यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – ‘आजोबा मतदानाला यायचं हं!’..विद्यार्थ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे आवाहन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू याच्या ओळखीच्या महिलेचा मोबाईल फोन महादेव शिंदे यांनी चोरी केल्याचा संशय होता. बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चिखली मधील चौधरी वजन काट्या जवळ महिला महादेव शिंदे यांच्याकडे चौकशी करत होती. त्यावेळी राजू आणि विनोद तिथे आले. त्यांनी शिंदे यांच्यासोबत वाद करून हाताने मारहाण केली. राजू याने लाकडी बांबूने शिंदे यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तर विनोद याने लाकडी फळीने मारहाण करून शिंदे यांना ठार मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.