‘मी पक्षातून बाहेर पडल्यानंतर उलट जास्त त्रास झाला’; वसंत मोरेंचं सूचक विधान
पुणे | वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. वसंत मोरे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे वसंत मोरे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, वसंत मोरेंनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
वसंत मोरे म्हणाले की, महाविकास आघाडीकडे मी उमेदवारी मागण्यासाठी गेलो नव्हतो. पुण्याची समीकरणं कशी जमू शकतात त्याचा तुम्ही विचार करा हे मी त्यांना सांगू इच्छित होतो. पण मला वाटतं की कदाचित मी थोड्या दिवसांत सांगेन की मनसेच्या पुण्यातल्या कोणत्या नेत्यांनी माझ्या वाटेत पुन्हा एकदा काटे टाकले. कुणी कुठे बैठका घेतल्या हे सांगेन. मला हे कळत नाही की पक्षात होतो तेव्हाही मला त्रास दिला गेला. पण आता पक्षातून बाहेर पडल्यानंतर उलट जास्त त्रास झाला.
हेही वाचा – ‘आजोबा मतदानाला यायचं हं!’..विद्यार्थ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे आवाहन
मला वाटतं की मी बाहेर पडल्यामुळे बऱ्याच जणांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना वाटलं की आता हा नक्की काय करतोय. जे कुणाला कधीच शक्य झालं नाही, ते शक्य करून दाखवतोय की काय. हा काय गणितं आखू शकतो? याची चिंता या लोकांना वाटायला लागली. त्यामुळे मी जी सांगड घालू पाहात होतो पुण्यात ती विस्कटली. पण मी विस्कटणार नाही. मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मी अपक्ष उमेदवारीवर ठाम आहे. आता मी कुणाकुणाला काय काय उपद्रव करतो हे पुणे शहरातल्या सर्व पक्षांना कळेल, असं वसंत मोरे म्हणाले.
मी पुण्यात पहिल्या क्रमांकावरच राहीन. पुणेकरांचा उमेदवार मीच असेन. पुणेकरांनी वर्षभरापूर्वी गिरीश बापट यांचं निधन झालं तेव्हाच हे ठरवलं आहे. आता मी पक्ष, संघटना या सगळ्या गोष्टींना तिलांजली दिली आहे. आता मी निवडणूक लढण्याच्या पूर्ण तयारीत आहे. आत्ता नाही, दोन वर्षांपासून माझी तयारी चालू आहे, असंही वसंत मोरे म्हणाले.