बळीराजा शेतकरी संघटना लोकसभेच्या रिंगणात
इस्लामपूर – हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने बी. जी. पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील टाळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली. याबरोबरच सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद या सहा लोकसभेच्या जागांवर बळीराजा शेतकरी संघटना निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, “केवळ शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आमचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत काँग्रेसचे सरकार नालायक होते म्हणून लोकांनी भाजपचे सरकार निवडून दिले. मात्र ते काँग्रेसच्या पुढे एक पाऊल महानालायक निघाले. त्यांना शेतकरी व सर्वसामान्य लोकांशी काही देणेघेणे नाही. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरीही शेतकरी गुलामगिरीतच जगत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले नाही.
साताऱ्यातून मी स्वतः, हातकणंगलेमधून बी जी पाटील, माढा मधून संजय पाटील – घाटणेकर, सांगलीमधून डॉ. उन्मेष देशमुख, कोल्हापूरमधून नितीन पाटील, उस्मानाबाद मधून भीमाशंकर बिराजदार निवडणूक लढवणार आहेत, असं पंजाबराव पाटील यांनी सांगितले.
बळीराजा बरोबरच मराठा क्रांती सेनेचे सुरेश पाटील, नागपूरची जय जवान जय किसान संघटना, स्वाभिमानीमधून फुटलेला शिवाजी माने गट, शिरोळमधून अंकुश आंदोलन तसेच समविचारी एकत्र येऊन लढत देणार आहोत, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
पत्रकार बैठकीला अमोल चव्हाण, अशोक सलगर, सुधीर कदम, साजिद मुल्ला, उत्तम ख बा ले, सुनील कोळी, चंद्रकांत खामकर, मनोज पवार, धनाजी जाधव उपस्थित होते