‘एल-निनो’मुळे पाणीकपातीचे सक्त निर्देश, सिंचनासाठी प्रस्तावित व सुरु असलेली आवर्तने तात्काळ थांबविण्याचे आदेश

नांदेड: एल निनोने आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली असून जून अर्धा संपला तरी कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे राज्यभरात पाणीकपातीच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सिंचनासाठी सुरू असलेली व प्रस्तावित आवर्तने थांबविण्याचे आदेश देखील शनिवारी (दि. 13) देण्यात आले आहेत.
एरवी मृगनक्षत्राच्या पूर्वी मान्सूनपूर्व पाऊस किंवा रोहिण्या बऱ्यापैकी बरसतात. परंतु यंदाचे वर्ष राज्याचा काही भाग अपवाद वगळता कोरडा राहिला आहे. दि. 8 जून रोजी मृगनक्षत्रास सुरूवात होऊन आता आठवडा उलटून गेला आहे, तरी देखील कुठेही समाधानकारक पावसाचा पत्ता नाही. आकाशात ढगांची गर्दी होत आहे, परंतु जोरदार वाऱ्याने ढग गायब होत असून वातावरणात पुन्हा कमालीचा उकाडा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने नुकत्याच जारी केलेल्या अंदाजानुसार यंदा एल-निनोचा प्रभाव राहणार असून त्यामुळे पावसाळा उशीरा सुरू होऊ शकतो.
गतवर्षी सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस पडल्यामुळे जूनच्या मध्यापर्यंत सुद्धा बऱ्याचशा धरणांमध्ये जलसाठा आहे. परंतु नियमित पाणी पुरवठा व सिंचनामुळे तो झपाट्याने कमी होत चालला आहे. एल-निनोमुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता गृहित धरुन राज्यातील विविध धरणे, जलाशयव इतर जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता पिण्याच्या पाण्याच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून या पार्श्वभूमीवर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – भारताने अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारले! रशियाकडून विक्रमी तेल खरेदी ; मे महिन्यातच ६.७ अब्ज डॉलर्सची आयात
सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील धरणे व जलाशयांमधील उपलब्ध पाणी साठ्याचा तातडीने आढावा घेऊन सिंचनासाठी प्रस्तावित व सुरु असलेली पाणी आवर्तने तात्काळ बंद करावी, अत्यावश्यक परिस्थिती वगळता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव टेवण्यात आलेल्या जलसाठ्याचा वापर इतर कोणत्याही कारणासाठी करण्यात येऊ नये, दि. 31 ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी पुरावे, या दृष्टीने जिल्हास्तरावर कृतिआराखडा तयार करावा, सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून परिस्थिती आटोक्यात ठेवावी, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
धरणे, कालवे, नद्या, तलाव व इतर जलस्रोतांमधून होणारा अनःिकृत व बेकायदा पाणी उपसा तात्काळ थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबावण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले असून महसूल, पोलीस व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक स्थापन करुन त्यामार्फत नियमित तपासणी व गस्त आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.





