‘पवारसाहेब, तुमसे बैर नहीं, समरजित तुम्हारी खैर नहीं’; हसन मुश्रीफांचा पलटवार

कोल्हापूर | भाजपाचे कागल विधानसभेचे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीकास्र सोडले होते. लाचरीचा स्वीकार करणाऱ्यांना कागलकर धडा शिकवणार आणि साथ देण्याऐवजी सोडून जाणाऱ्यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असे आव्हान कागलमधून शरद पवार यांनी दिले होते. यावर आता हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादीतून ४० ते ५० आमदार फुटून बाहेर पडले. तरीही शरद पवार माझ्याच मागे का लागले आहेत. हे कळायला मार्ग नाही. पण यानिमित्ताने मी एकच सांगेन की, पवार साहेब तुमच्याशी माझे वैर नाही आणि समरजित तुझी आता खैर नाही. ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक अशी आहे. शरद पवार साहेबांनी कायम प्रजेचा आणि रयतेमधून आलेल्या सामान्य कार्यकर्त्यांचा प्रचार केलेला आहे.
हेही वाचा – विधानसभा निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले..
समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यामुळे काय परिणाम होईल का? असा प्रश्न पत्रकारांनी हसन मुश्रीफ यांना विचारला. तेव्हा ते म्हणाले की, निवडणुकीत काय होईल? याचा निकाल जनता ठरवेल. कुणालाही कमी लेखून चालत नाही.
मंत्री होण्यासाठी आधी निवडणुकीत निवडून यावे लागेल. मागच्या सहा निवडणुकांमध्ये मी विजय मिळविला आहे. तेव्हा माझ्यासमोर एकापेक्षा एक असे उमेदवार होते. तीन वेळा तिरंगी लढत झाली, तीन वेळा दोघांमध्ये लढत होती, तरीही मी विजय मिळवत आलो आहे, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.





