जनतेसाठी काटकसर, पण साहेबांसाठी लवाजमा का? अंजली दमानियांनी पंतप्रधानांना सुनावले

मुंबई | पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन बचतीचा सल्ला देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार टीका केली आहे. जनतेला उपदेश देताना स्वतःच्या दौऱ्यांवरूल आणि सुरक्षेवरील अफाट खर्चाचे काय, असा रोखठोक प्रश्न उपस्थित करत त्यांनी पंतप्रधानांच्या या भूमिकेला ‘दुटप्पीपणा’ म्हटले आहे.
हैदराबाद येथील विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदींनी जागतिक तेल संकटावर भाष्य केले. अमेरिका-इराण तणावामुळे इंधनाचे दर वाढण्याची भीती व्यक्त करत त्यांनी देशवासियांना काही पथ्ये पाळण्याचे आवाहन केले. यामध्ये शक्य तिथे ‘वर्क फ्रॉम होम’ करणे, ऑनलाइन बैठका घेणे, स्वयंपाकाच्या तेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करणे आणि परदेशी वस्तूंची खरेदी टाळणे अशा उपाययोजनांचा समावेश होता. इंधन आणि सोन्याची खरेदी कमी केल्यास देशाचे परकीय चलन वाचेल, असे मत त्यांनी मांडले.
हेही वाचा
पेट्रोल-डिझेलचा वापर जपून करावा; पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन
अंजली दमानियांची सडकून टीका
पंतप्रधानांच्या या भाषणातील विसंगतीवर बोट ठेवत अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधानांच्या घोषणा ऐकून आश्चर्य वाटल्याचे सांगत त्यांनी सरकारी खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधान स्वतः एका दिवसात चार्टर्ड विमानाने विविध राज्यांचे दौरे करतात, त्यांच्या ताफ्यात ४० ते ५० गाड्या असतात आणि एसपीजी सुरक्षेवर दररोज कोट्यवधी रुपये खर्च होतात, याकडे दमानिया यांनी लक्ष वेधले.
सामान्य जनतेला मेट्रोने प्रवास करा, कारपूल करा आणि सोने खरेदी करू नका, असा उपदेश दिला जातो. मात्र, हीच तत्त्वे स्वतःला का लागू होत नाहीत? साहेब, झूम (Zoom) ॲप अजूनही चालू आहे. राजकीय रॅली, सभा आणि भाषणांसाठी त्याचा वापर करून इंधन आणि पैशांची बचत करता येऊ शकते. जनतेसाठी काटकसर आणि स्वतःच्या पक्षाच्या प्रचारासाठी उधळपट्टी, हा दुटप्पीपणा नाही का? असा सडेतोड सवाल दमानिया यांनी केला आहे.





