‘मोदी ७५ वर्षांचे होतायंत म्हणून निवृत्तीचे संकेत’; संजय राऊतांचं विधान

Sanjay Raut | मोरोपंत पिंगळे एकदा म्हणाले होते की जेव्हा पंचाहात्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, तुमचं वय झालं आहे; बाजूला सरा, आम्हाला काम करु द्या, असं मोहन भागवत यांनी पुस्तक प्रकाशनाच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं. मोहन भागवत यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. दरम्यान याबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, की मी या संदर्भात एक रोखठोक लिहिलं होतं. नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात गेले होते. त्यावेळी काय चर्चा झाली त्याचा सारांशही मी लिहिला होता. ७५ वर्षे हे भाजपातलं निवृत्तीचं वय आहे. नरेंद्र मोदींनी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग यांना निवृत्ती स्वतःच्या स्वार्थासाठी लादली. आता सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होत आहेत. त्यांची दाढी पिकली आहे, त्यांच्या डोक्यावरचे केसही उडाले आहेत. जगभ्रमण करुन झालं आहे. सगळी सुखं भोगून गेलं आहे. आता जो नियम तुम्हीच केला आहे ७५ वर्षे वयाचा. मला वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना सूचित करतं आहे की तुम्हाला निवृत्त व्हावं लागेल. त्यांना देश सुरक्षित हातांमध्ये सोपवावा लागेल, असं संजय राऊत म्हणाले. तसंच अमित शाह यांच्या मनात निवृत्तीचे विचार येत असतील तर देशासाठी हे शुभसंकेत आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
हेही वाचा : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
७५ वर्षे निवृत्तीचा नियम आहे तो सगळ्यांसाठी समान आहे. लालकृष्ण आडवाणी असोत, नरेंद्र मोदी असोत किंवा अमित शाह.त्यांना आता निवृत्त व्हावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी वचनं देतात ती विसरतात. १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्याचं वचन, गरीबी हटवण्याचं वचन, पाकिस्तानला धडा शिकवण्याचं वचन हे सगळं मोदी विसरले आहेत. मात्र तुम्हाला निवृत्त व्हायचं आहे ही बाब देश मोदींना विसरु देणार नाही तसंच सरसंघचालक मोहन भागवतही विसरु देणार नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले.





