‘शरद पवारांना सोडण्याचा प्रश्नच येत नाही’; दिलीप वळसे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. काही लोकं विचारतात की तुम्ही पवार साहेबांना का सोडलं? पण शरद पवारांना सोडण्याचा प्रश्नच येत नाही. बऱ्याच लोकांना आतल्या गोष्टी माहीत नाहीत, असं म्हणत वळसे पाटलांनी शरद पवरांना सोडलं नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
आंबोगावमधील कळंब येथे बोलत असताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, की काही लोकं विचारतात की तुम्ही पवार साहेबांना का सोडलं. पवार साहेबांना सोडायचा प्रश्नच येत नाही. बऱ्याच लोकांना बऱ्याच आतल्या गोष्टी माहीत नसतात. पक्षाच्या 54 आमदारांनी बैठक बोलावली आणि त्यात सरकारमध्ये जाण्याची चर्चा झाली. आपण सरकारमध्ये जायचं ठरलं. दुसऱ्या पक्षात नाही. आपण कोणत्या पक्षात गेलो नाही, आपला पक्ष राष्ट्रवादी व चिन्ह घड्याळच असल्याचे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
हेही वाचा – ‘भाजपाने आमच्यात लुडबुड करू नये’; आमदार सुनील शेळके यांचा इशारा
रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचं होतं. गेल्या दोन वर्षांत अजितदादा अर्थमंत्री असल्याने त्यांनी भरभरून पैसा दिला आणि आपली कामे झाली. राजकारणात अशा गोष्टी कधी कधी घडतात. एकदा आपण पुलोद स्थापन केला, एकदा काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. तसं आज राजकारणात काही बदल झाला तर हा बदल परिस्थितीप्रमाणे हाताळायचा असतो. याचा अर्थ लगेच आपण शरद पवार साहेबांचे शत्रू झालो, आणि ते आपले शत्रू झाले असं नाही. त्यांच्या बाबत प्रेम व आदर आजही आपल्यात आहे. पण विरोधकांकडे मुद्दे नाहीत, काही भांडवल नाही, बोलायला मुद्दे नाहीत म्हणून हे भावनिक मुद्दे मांडले जात असल्याचेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.





