ताज्या घडामोडीमुंबई

रेल्वे मोटरमनकडून सिग्नलच्या नियमांचा भंग, सेवेतून सक्तीच्या निवृत्तीची शिक्षा

रेल्वेमधील समस्त कर्मचारी संघटनेचा या कठोर कारवाईविरोधात आक्रमक पवित्रा

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख बनलेल्या लोकलचे सारथ्य करणारे मोटरमन सध्या वेगळ्याच विवंचनेत अडकले आहेत. लोकल चालविताना काही वेळ नकळत मोटरमनकडून सिग्नलच्या नियमांचा भंग होतो आणि त्याची शिक्षा म्हणून संबंधितांना सेवेतून सक्तीची निवृत्ती घेण्यास भाग पाडले जात आहे. या कठोर कारवाईविरोधात रेल्वेमधील समस्त कर्मचारी संघटना आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.

मुंबईत दररोज सुमारे १ हजार ८१० लोकल धावत असून या सर्व लोकल सुमारे ६० हजारांहून अधिक थांबे घेतात. मुंबई विभागात दर तीन मिनिटाला एक लोकल धावते. तसेच मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर सुमारे दोन हजारांहून अधिक सिग्नल आहेत. मुंबई विभागातील सिग्नल नियमाप्रमाणे डाव्या बाजूला नाहीत. सिग्नल कधी डावीकडे, तर कधी उजवीकडे, फलाटावर, ओव्हर हेड वायरच्या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. त्यामुळे, मोटरमनला प्रत्येक वेळी सतर्क राहून सिग्नल पाहून त्याचे पालन करावे लागते. तसेच काही ठिकाणी दोन सिग्नलमध्ये २०० मीटर, तर काही ठिकाणी ४०० मीटर अंतर असते. त्यामुळे मोटरमनला पुढील सिग्नलचा अंदाज बांधणे कठीण होते. मात्र, क्वचितच मोटरमन सिग्नलपासून काही फुटांवर लोकल उभी करतात. सिग्नल तोडण्याच्या, फलाटावरील नियोजित जागेऐवजी लोकल पुढे थांबण्याच्या घटना घडतात. या चुकांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होत नाही. मात्र अशा स्वरुपाच्या चुकांमुळे मोटरमनला सेवेतून सक्तीने निवृत्ती (सीआरएस) घेण्यास भाग पाडण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागते.

लाल सिग्नल तोडल्यास, ओव्हरशूटचे प्रकार घडल्यास रेल्वे प्रशासन मोटरमनला थेट कामावरून काढण्याची कारवाई करीत आहे. सिग्नल तोडण्याच्या प्रकारानुसार पदाची श्रेणी आणि पगार कमी करण्याची कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र, सरसकट सक्तीने निवृत्ती घेण्यास भाग पाडण्याच्या कारवाईमुळे मोटरमनच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. या कारवाईमुळे मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न, आई – वडिलांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च भागविणे अशा अनेक समस्यांना संबंधित मोटरमनना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा स्वरुपाच्या कारवाईविरोधात आंदोलन करण्याचा निर्धार मोटरमन असोसिएशनने केला आहे. मोटरमनची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेवेत कार्यरत मोटरमनवर कामाचा भार वाढला आहे. लोकल फेऱ्या चालवण्यासाठी इतर मोटरमनना अतिरिक्त तास काम करावे लागत आहे. रिक्त पदे भरल्यावर मोटरमनना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या संपुष्टात येतील.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमनची एकूण १,०७६ मंजूर पदे आहेत. मात्र यापैकी ३७३ पदे रिक्त असून ७३५ मोटरमन कार्यरत आहेत. सीएसएमटी कर्मचारी दालनात (लॉबी) ५५५ पदांपैकी १९७ पदे रिक्त आहेत. तसेच कल्याणमध्ये ३७० पैकी १२३ पदे, तर पनवेलमध्ये १५१ पैकी ५३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. रिक्त जागांमुळे इतर मोटरमनच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. अवेळी जेवण, कुटुंबियांना वेळ न देता येणे, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रजा घेणेही कठीण झाले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button