मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठुरायाची महापूजा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-2024-07-17T134056.815-780x470.jpg)
पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी लता यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन येथील रहिवासी असणारे शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) यांना महापूजेचा मान मिळाला. ते मागील 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.
राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करुन त्याला सुजलाम सुफलाम ठेव. त्याच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असं मागणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाकडे मागितले आहे. माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा दिवस आहे. कारण सलग तिसऱ्या वर्षी मला श्री विठ्ठल रुक्मिणीची महापुजा करण्याचं भाग्य लाभल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी फुंकली ‘बंडाची तुतारी’
यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशिर्वादाने राज्याचा कारभार सुरु आहे. वारकरी म्हणजेच शेतकरी, कष्टकरी, युवक, ज्येष्ठ यांच्या जीवनात सुखी समाधानाचे दिवस येऊ दे असं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, तिरुपती बालाजीप्रमाणेच दर्शन मंडप आणि टोकन पध्दत सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे 103 कोटी सरकार देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यामुळं वारकऱ्यांना 12 ते 15 तास दर्शनाला रांगेत उभा राहावं लागणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या दर्शनासाठी एक रुपयाही मंदिर समिती घेणार नाही असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आज मी समाधानी आहे. कारण मी मुख्यमंत्री असताना पंढरपूरमध्ये अनेक कामं करता आली. मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. रस्ते पाणी, दिवाबत्ती याचीही कामं होतील असे मुख्यमंत्री म्हणाले. विकासकामात आम्ही कुठेही कमी पडणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सर्वांना आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.