अष्टविनायकमधील सिद्धटेकचा भीमा नदीवरील पूल १० दिवस बंद ; मुंबई, पुण्याहून येणाऱ्या भाविकांना पर्यायी मार्गाचे आवाहन

कर्जत: अष्टविनायकपैकी एक असलेल्या सिद्धटेक येथील भीमा नदीवरील मोठा पूल उद्या शनिवारपासून १० दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे त्यामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पुणे व मुंबई येथून येणाऱ्या भाविकांची होणार गैरसोय होणार आहे. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दौंड–सिद्धटेक–भांबोरा–राशिन–करमाळा या राज्य मार्गावरील सिद्धटेक येथील भीमा नदीवरील मोठा पूल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या संध्याकाळपासून पुढील दहा दिवस वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही दुरुस्ती अत्यावश्यक असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस असून सिद्धटेक येथे पुणे, मुंबई यासह राज्यातील विविध भागांमधून गणपती दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. मात्र हा पूल बंद राहिल्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे. पर्यायी मार्गाने भाविकांना आता दर्शनासाठी यावे लागणार आहे. या पुलाचा उपयोग खास करून मुंबई, पुणे या ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाचा मानला जातो.
हेही वाचा – विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप, AI चा वापर अन् इंधन साठेबाजीवर कडक कारवाई; वाचा मुख्यमंत्री काय म्हणाले…
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ फेब्रुवारीला स्ट्रक्चरल कन्सल्टंटमार्फत पुलाची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणी अहवालात पुलाच्या मंदिराकडील भागात तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पुलाच्या संरचनेची सुरक्षितता लक्षात घेऊन तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुरुस्तीच्या काळात पुलावरून कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे उद्या संध्याकाळपासून पुढील दहा दिवस हा मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सिद्धटेकचे सरपंच व ग्रामसेवक यांना अधिकृत पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या असून, स्थानिक नागरिक, व्यापारी, वाहनचालक आणि प्रवाशांना याबाबत माहिती देण्याचे निर्देश प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. दुरुस्तीच्या कालावधीत वाहतूक कोंडी किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करणे आवश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले. पुलाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येणार असून, भविष्यातील धोके टाळणे आणि सुरक्षित व टिकाऊ वाहतूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी दुरूस्ती होत आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सिद्धटेक ग्रामपंचायतीने केले आहे.





