‘निवडणुकीत संघाच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला गेला’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे खडेबोल
वर्षभरापासून मणिपूर शांतीची वाट पाहतंय - मोहन भागवत

नागपूर | निवडणूक ही लोकशाहीतील नियमित प्रक्रिया आहे. त्यात स्पर्धा असली तरी मर्याचा आवश्यक असते. निवडणूकीच्या प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन झाले. आता निवडणूक संपली असून सर्वच पक्षांनी देशातील समस्यांना सोडविण्यावर विचार केला पाहिजे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयच्या समारोपप्रसंगी ते बोलत होता.
मोहन भागवत म्हणाले, सर्वसहमतीने देश चालला पाहिजे यासाठी संसद आहे. निवडणूक ही एक प्रकारची स्पर्धा आहे, स्पर्धेमुळे अडचणी येतात त्यामुळे बहुमत महत्त्वाचं असतं. या निवडणुकीत संघासारख्या संघटनेला ओढण्यात आलं. बरंच काही बोललं गेलं. टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन गोष्टी मांडल्या गेल्या. विद्येचा उपयोग समाज प्रबोधनासाठी करायचा असतो. मात्र या आधुनिक तंत्राचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करण्यात आला. निवडणूक लढताना एक प्रकारची मर्यादा असते.
हेही वाचा – ‘लोकसभा तो सिर्फ ट्रेलर है, विधानसभा पिक्चर अभी बाकी है’; निलेश लंकेंचा हल्लाबोल
लोकशाहीत निवडणूक ही अनिवार्य प्रक्रिया आहे. यात दोन पक्ष असल्याने स्पर्धा राहायला हवी. मात्र, हे युद्ध नाही. प्रचारादरम्यान ज्या पद्धतीने टीका झाली त्यातून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता निवडणुका आटोपल्या असून ‘एनडीए’चे सरकार स्थापन झाले आहे. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यायला हवं, अशी अपेक्षा मोहन भागवत यांनी व्यक्त केली.
मागच्या वर्षभरापासून अधिक काळ मणिपूर जळतंय, मणिपूरचा विचार करुन तिथे शांतता प्रस्थापित करणं आवश्यक आहे. हे कुणी घडवून आणलं आहे? याकडे लक्ष दिलं पाहिजे. अजून बरीच कामं करायची आहेत. सगळी कामं सरकार करणार नाही. मणिपूर अनेक वर्ष शांत होतं. आता पुन्हा पेटलं आहे. जुने वाद बंद जाले पाहिजेत. द्वेषाचं वातावरण निर्माण झाल्याने मणिपूरमध्ये त्राहीमाम परिस्थिती आहे. त्यामुळे मणिपूर शांत करण्यासाठी प्राधान्य देणं आवश्यक आहे, असंही मोहन भागवत म्हणाले.




