मविआची बैठक, वंचितला निमंत्रण नाही; संजय राऊत म्हणाले..
मुंबई | महाविकास आघाडीने आज एक महत्वाची बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीला मविआने वंचितला निमंत्रण दिलेलं नाही. त्यामुळे वंचित महाविकास आघाडीतून बाहेर जाणार असल्याची चर्चा आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे आमच्यासाठी सन्माननीय नेते आहेत. आमची त्यांच्याशी अनेकदा चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान, महाविकास आघाडीने त्यांना राज्यात चार जागा देण्याचं ठरवलं आणि तसा प्रस्ताव आम्ही वंचितसमोर ठेवला. त्यांनी निवडलेल्या २७ जागांपैकी चार जागांचा प्रस्ताव आम्ही त्यांच्यासमोर ठेवला होता. परंतु, आम्हाला वंचितची वेगळी भूमिका दिसतेय.
हेही वाचा – पुणे लोकसभेसंदर्भात वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत
आम्ही वंचितला दिलेला चार जागांचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला असता तर आम्हाला नक्कीच आनंद झाला असता. आमचा देशातल्या हुकूमशाहीविरोधात लढा चालू आहे, संविधान वाचवण्याच्या आमच्या लढ्याला प्रकाश आंबेडकर यांच्या येण्याने हातभार लागला असता. त्यांच्या आमच्यातील सहभागाने आमच्या लढ्याला आणखी गती आणि बळ मिळालं असतं. मला अजूनही खात्री की, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि वंचितचे नेते एकत्र बसतील. त्यांच्यात सकारात्मक चर्चा होईल. प्रकाश आंबेडकर यांच्या मनात काही नाराजी असेल, अस्वस्थता असेल ती दूर करण्यात आमच्या नेत्यांना यश मिळेल, असं संजय राऊत म्हणाले.