मुंडे-महाजन कुटुंबाचं नाव पुसण्याचा कोणाचा तरी प्रयत्न; खासदार संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
मुंबई: भाजपने राज्यात १० जागांसाठी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र पक्षाच्या बीडमधील नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंडे समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात असतानाच शिवसेनेनंही याबाबत आपली भूमिका जाहीर करत राज्यातील भाजप नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवारांबाबत भाष्य केलं.
‘पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याने ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या ऐकल्यानंतर मुंडे-महाजन कुटुंबाचं नाव पुसण्याचा कोणाचा तरी प्रयत्न आहे का, अशी शंका आमच्या मना निर्माण होत आहे,’ असं म्हणत राऊत यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला आहे. दरम्यान, कोणाला उमेदवारी द्यायची हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. मात्र शिवसेना आणि भाजपच्या २५ वर्षांच्या युतीच्या काळात आमचा मुंडे-महाजन यांच्याशी निकटचा संबंध आला. दिवगंत गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. त्यांच्या कन्या पंकजा मुंडे या वडिलांप्रमाणेच बहुजन समाजाच्या, ओबीसी समाजाच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांना डावलणं व्यथित करणारं आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
- शिवसेना नेत्याकडून पंकजांना खुलं निमंत्रण
भाजपने विधानपरिषद निवडणुकीत पत्ता कट केल्यानंतर पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याचं आमंत्रण शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलं आहे. पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या तर आम्हाला आनंद होईल, त्यांचं स्वागतच करू, अशी भूमिका खोतकर यांनी मांडली आहे. तसंच भाजप मुंडे परिवाराला जी वागणूक देत आहे, ते दु:खद असल्याचंही ते म्हणाले.